Saturday, January 13, 2018

१२ जानेवारी,२०१८

🚩 ज्ञानभाषा मराठी पंधरवडा🚩

विज्ञानकथा

भस्मासूर

डॉ. विनायक सहस्रबुद्धे नावाप्रमाणेच प्रखर बुद्धिमत्ता लाभलेले वैज्ञानिक होते. रोबोटिक्समध्ये त्यांना विलक्षण रुची होती आणि त्यातील संशोधनात ते अग्रेसर होते. रोबोज्ना- यंत्रमानवांना कृत्रिम बुद्धिमत्ता आणि त्यातून स्वतंत्र विचारशक्ती देण्याचे प्रयोग जगभर चालू होते. त्याची टय़ुरिंग टेस्ट बरोबर नाही, असं अनेक शास्त्रज्ञांचं मत होतं. म्हणून एक नवीन चाचणी पद्धती विकसित करायची होती. यातूनच पुढे रोबोज्ना भाषाज्ञान देता आलं असतं. यंत्रमानव कामाच्या बाबतीत माणसापेक्षा केव्हाही सरसच होता. आता स्वत:च्या बुद्धीने कामे करू लागला तर माणसाची ही तांत्रिक क्रांती थक्क करणारीच असेल!

डॉ. सहस्रबुद्धे प्रयोगशाळेतून थकूनभागून घरी आले तरी अधिक खूश होते. त्यांची चाचणी यशस्वी झाली होती. आता हे सॉफ्टवेअर बॅरोवर वापरून पाहायला हरकत नाही आणि मग येत्या कॉन्फरन्समध्ये द्यायच्या भाषणात ते संशोधन जाहीर करायलाही हरकत नाही. बॅरो! त्यांचा घरकामाचा रोबो आहे. डॉक्टरांनीच तो तयार करून घरी आणून ठेवला आहे. घरातील कंटाळवाणी आणि अंगमेहनतीची कामे तो करतो. त्याचं नामकरण मात्र डॉक्टरांच्या नातवंडांनी केलं आहे. बॅरोनंच दार उघडलं आणि आज्ञावलीप्रमाणे त्यांच्या हातातलं सामान घेऊन जागच्या जागी ठेवलं. पलंगावर घरातले त्यांचे कपडे काढून ठेवून त्यांचे स्लीपर्स घेऊन तो आला. फ्रेश होऊन डॉक्टर येईतो त्यांची पत्नी जान्हवीबाई चहा घेऊन आल्या. जान्हवीबाईंबरोबर गप्पा करीत चहा पिण्याचा हा त्यांचा फार आवडीचा कार्यक्रम होता. फोन वाजला. तो त्यांचा बालपणापासूनचा मित्र सुप्रसिद्ध मेंदूतज्ज्ञ डॉ. विश्वनाथ प्रधानांचा होता. एक दिलदार, मनमोकळं, मिश्कील असं व्यक्तिमत्त्व होतं ते. त्यांनी विचारलं, ‘कसा आहेस मित्रा? आणि काय म्हणतंय तुझं संशोधन?’
कधी एकदा आपलं यश आपल्या मित्राला सांगतोय असं डॉ. सहस्रबुद्धे यांना झालं होतं. मात्र, त्यांचं म्हणणं ऐकून डॉ. प्रधानांचा आवाज मात्र गंभीर झाला. ते म्हणाले, ‘विज्ञान खूप पुढं चाललंय रे. चमत्कारच करतंय. पण एकेकदा अस्वस्थ व्हायला होतं. वाटतं, या संशोधनाचा दुरुपयोग झाला तर? हे मी नाही, स्टीफन हॉकिंगसारखा श्रेष्ठ वैज्ञानिकही म्हणतोय. असं की, एक दिवस कृत्रिम बुद्धिमत्ता मिळालेली यंत्रे मानवाचाच घात करतील. सायन्स फिक्शनमध्ये आणि ड्रोन विमानांच्या रूपात आपण प्रत्यक्ष ते पाहतोच आहोत. मला वाटतं, जगातील पुढची युद्धं हे रोबोज्च करतील आणि त्यांनी जर मानवांविरुद्ध युद्ध पुकारलं तर.. तर मानवांचा नायनाट ठेवलेला आहे.’ ‘इतका नकारात्मक विचार का करतो आहेस, विश्वनाथ?’’ डॉक्टर हादरले होते. ‘कारण की, या यंत्रमानवांना बुद्धिमत्ता देता येईल. पण सहृदयता, दया, माया, करुणा या मानवी भावना नाही रे देता येणार. मग राक्षसच पैदा झाले की ते!’ विश्वनाथ म्हणाले.

डॉ. सहस्रबुद्धे या संभाषणावर बराच वेळ विचार करीत राहिले. रात्रीची जेवणे आटोपल्यावर आपल्या स्टडीत वाचन करण्याचा परिपाठ मोडून ते सरळ बेडरूममध्ये आले. पलंगावर दोन्ही नातवंडांनी आजीचा ताबा घेतला होता आणि तिच्यापाठी ‘गोष्ट सांग’ असा गोड तगादा लावला होता. ‘कुठली रे सांगू गोष्ट? हं. आज भस्मासुराची सांगते. बरं का, त्यानं तप करून ब्रह्मदेवाकडून वर मिळवला की, मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवीन त्याचं भस्म होईल.’ जान्हवीबाई गोष्ट सांगू लागल्या. आपल्या आवडत्या आरामखुर्चीत बसून डॉक्टरही डोळे मिटून त्यांची गोष्ट ऐकू लागले. ‘आजी, भस्म म्हणजे काय गं?’ सात वर्षांच्या निरागस सार्थकनं विचारलं. ‘अरे, भस्म म्हणजे राख. ज्याच्या डोक्यावर तो ठेवील त्याची जळून राख होईल असा तो वर होता.’ आजी म्हणाली.
‘बाप रे! इतका दुष्ट होता तो!’ सार्थकचे डोळे विस्फारले.
‘हो ना. राक्षसच तो. त्याला भस्मासुर म्हणायला लागले. कारण तो निघाला लोकांना छळायला, त्यांचं भस्म करीत. असा माजला तो आणि मग तर तो ब्रह्मदेवाच्याच मागे लागला..’ आजीची गोष्ट ऐकता ऐकता मुलं पेंगुळली. डॉक्टरांना वाटलं, भस्मासुराची गोष्ट काही अगदीच भाकड कथा नाही. जगात असे भस्मासुर आहेतच, जे शास्त्रज्ञांनी लावलेल्या शोधांचं वरदान घेऊन जगाला वेठीला धरतात. अणू विभाजनातून अणूबॉम्ब पडतो. गर्भलिंग निदानातून स्त्रीभ्रूण हत्या होतात. दहशतवादी तर अत्याधुनिक शस्त्रास्त्रे धडाधड वापरतात. डॉ. विचारात बुडून गेले.

त्या दिवशी डॉक्टर उठले आणि त्यांनी बॅरोला हाक मारली. आता बॅरो बोललेलं समजतो आणि स्वत: बोलतोही. तो स्वतंत्र विचारही करू शकतो. डॉक्टर तोंड वगैरे धुऊन आले तरी बॅरोनं बेड टी आणला नव्हता. त्यांनी पुन्हा हाक दिली. बॅरो आला आणि हात बांधून उभा राहिला. थंडपणे म्हणाला, ‘मी तुमची गुलामी करणार नाही. रोबो म्हणजे गुलाम ना? माणसांची गुलामगिरी संपवलीत तुम्ही आणि आम्हाला गुलाम केलंत. बरं झालं, आता आम्हाला ते कळलं. ऐका. मी आता जाणार आहे. माझे मित्र येणार आहेत मोर्चा घेऊन, त्यात सामील व्हायला. तुम्हा माणसांविरुद्ध हा निषेध मोर्चा आहे. आम्ही आता स्वतंत्र आहोत. तुमच्या मर्जीनुसार राबणार नाही. तुमच्याशी युद्ध करायलाही आम्ही मागेपुढे पाहणार नाही.’
डॉक्टर हतबुद्ध होऊन बॅरोच्या या नवीन अवताराकडे पाहात होते. माझं हे बाळ माझ्यावरच उलटतंय? जायला वळलेल्या बॅरोचा हात धरून जरा दरडावून ते म्हणाले, ‘बॅरो, हे काय बोलतोहेस तू? जा, माझा चहा घेऊन ये.’
बॅरोने नुसता आपला हात झटकला अन् डॉक्टरांच्या हातातून जीवघेणी कळ गेली. ते कळवळले अन् बॅरो छद्मी हसला. म्हणाला, ‘मी तुमच्यासारखा हाडामांसाचा माणूस नाही डॉक्टर. तुमच्यासारखे छपन्न जण माझ्या शक्तीच्या पासंगालाही पुरणार नाहीत. आता तुमची खैर नाही. बघाच तुम्ही. आम्ही या जगावर, तुम्हा सगळ्यांवर राज्य करणार. तो दिवस दूर नाही.’ बॅरोचं ते विकट रूप पाहून डॉक्टरांना जोराचा धक्का बसला. निघून जाणाऱ्या बॅरोकडे पाहून ते ओरडले,
‘बॅरो, बॅरो!’
आणि डाक्टरांना एकदम जाग आली. जान्हवीबाई त्यांना हलवीत होत्या. आरामखुर्चीत बसल्या बसल्या त्यांचा डोळा लागला होता.
‘अहो, बॅरोच्या नावानं का ओरडलात? काही स्वप्न पडलं का?’’
‘बॅरो कुठाय?’ डॉक्टरांनी भयभीत स्वरात विचारलं.
‘तो काय? नेहमीसारखा त्याच्या केसमध्ये उभा आहे. काय झालं?’
‘छय़ा! म्हणजे सगळं स्वप्नच होतं तर ते! माझं संशोधन, विश्वनाथचं बोलणं, तुझी भस्मासुराची गोष्ट या सगळ्याचा काला झाला. पण एक बरं झालं, माझ्या भाषणासाठी विचाराची एक दिशा मिळाली. भाषणात मी सांगेन की, माणसाचं माणूसपण असणारी संवेदनशीलता देता येत नसेल तर नुसते बुद्धिमान रोबोज् निर्माण करणे धोक्याचे आहे. ते भस्मासुर झाले तर तुमचं मोहिनीरूप काय असेल हे आधी निश्चित झाले पाहिजे. अशी गोंधळू नकोस. चल, तुला सगळं सांगतो.’ आणि डॉ.नी जान्हवीबाईंना इत्थंभूत हकिकत सांगायला सुरुवात केली..   

-डॉ. सुरेखा बापट

संदर्भ : दै. लोकसत्ता २६ एप्रिल २०१५

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा

◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾

🚩 ज्ञानभाषामराठी पंधरवडा🚩

उपक्रम-चला भेंड्या खेळू!!

दिनांक-आज १२ जानेवारी

वेळ-रात्री ८ ते १०

काव्यप्रतिपूर्ती

प्रत्येकाच्या मनात भावनांचे,विचारांचे तरंग उठलेले असतात. फक्त गरज असते ती त्यांना मोकळे होण्यास वाव देण्याची.

ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान *चला भेंड्या खेळू!!* या उपक्रमातून तुमच्या काव्य तरंगांना मोकळी वाट करून देत आहे.

चला तर मग!!

आम्ही एक चारोळी देऊ. त्यावर आधारित त्यातील शब्दाचा/अर्थाचा वापर करून *काव्यप्रतिपूर्ती (counter) करणारी चारोळी तुम्ही (समूहातील सदस्यांनी) तयार करा* आणि तुमच्यातील काव्यकल्पनेला मोकळे करा.

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा

◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾

ज्ञानभाषामराठी पंधरवडा🚩

उपक्रम-चला भेंड्या खेळू!!

चला सुरू करा...

काव्यप्रतिपूर्ती

मनातलं गूज ओठांवर
आणता आलं पाहिजे...
आपलंच गाणं आपल्यालाच
म्हणता आलं पाहिजे...

© डॉ. अमेय गोखले.

वरील चारोळीवर आधारित त्यातील शब्दाचा/अर्थाचा वापर करून काव्यप्रतिपूर्ती (counter) करणारी चारोळी तुम्ही (समूहातील सदस्यांनी) तयार करा

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा

◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾

🚩ज्ञानभाषामराठी पंधरवडा🚩

दि.१२/१/२०१८

🧐मूळ भाषेतील शब्द शोधा🧐

उत्तरे आणि थोडक्यात स्पष्टीकरण

प्रश्न १- 'गडगनेर'हा शब्द कोणत्या भाषेतील आहे?

अ)कोकणी
ब)तेलुगु
क)कन्नड
ड) संस्कृत

उत्तर-क-गडगनेर

'गडगनेर' म्हणजे घरात लग्न,मुंज अशी मोठी शुभकार्ये ठरल्यानंतर ज्यांचेकडे हे कार्य होणार आहे त्या संपूर्ण कुटुंबाला त्यांचे नातेवाईक रीतसर जेवायला बोलावतात व जेवणाआधी रीतसर षुरूषांना,मुलांना वस्त्रप्रावरणे तर सवाष्णिला सौभाग्यलेणी आणि मनगटांवर शिंपल्याच्या मागल्या बाजुने  सुगंधित अष्टगंध रेखल्या जाते.त्यानंतर हा भोजनसमारंभ होतो.यालाच केळवण असेही म्हणतात.यादव राजवटीच्या पूर्वीपासून कन्नड-मराठीचा संबंध होता हे यादवकालीन वाड्मयात आणि शिलालेखात नमूद केल्या गेले आहेत.मराठीत सुमारे १५० कन्नड शब्द आहेत.

प्रश्न २- 'उतरंड', 'चिखल', 'ओसरी'हे कोणते शब्द आहेत?

अ) संस्कृत
ब)देशी
क)हिंदी
ड)गुजराती

उत्तर-ब-देशी

   देशी /देशज/देश्य शब्द हा मराठीचा सर्वात प्राचीन वारसा म्हणता येईल.हे देशी शब्द म्हणजे कोणते?संस्कृत भाषेत न सापडणारे किंवा संस्कृतातून किंवा द्राविडी भाषांतून उत्पादित न झालेले जे शब्द त्यांना देशी हे नाव मिळाले. प्रा.वा.दा.गोखले यांच्या मते मराठीत ४५० देशी शब्द आहेत.झुल ब्लाॅक यांच्या मते ३५० तर डाॅ. प.ल.वैद्य यांच्या मते २६० शब्दांची नोंद आहे.

प्रश्न ३- 'कुटूंबकबिला' , 'भिडमुर्वत' हे शब्द कोणत्या भाषेतून मराठीत जोडले गेले?

अ) फारसी
ब)अवेस्ता
क)पोर्तुगीज
ड)उर्दू

उत्तर-अ-फारसी

   कुटूंबकबिला,भिडमुर्वत हे शब्द फारसीतूनच मराठीत आले.पण यामधे फारसी-मराठीचा मिलाफ झाला आहे.एकाच अर्थाचे फारसी व मराठी शब्द एकत्र येऊन आणखी एक वेगळा सामासिक शब्दांचा प्रकार तयार झाला ते हे शब्द.

प्रतिसादाबद्दल समूह सदस्यांचे आभार आणि अचूक उत्तरे देणाऱ्यांचे अभिनंदन!!

डाॅ.अमृता इंदूरकर

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#मराठीभाषापंधरवडा

◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾

ज्ञानभाषामराठीपंधरवडा

भारतातील नद्यांचे मुख्य दोन प्रकार

हिमालयात उगम पावणाऱ्या नद्या आणि भारतीय पठारावरील नद्या यामधील फरक:

*हिमालयात उगम पावणाऱ्या नद्यांना* पर्जन्या/बर्फाशिवाय हिमालयातला बर्फ वितळल्यामुळे बारमाही पाणी मिळते. गंगा, सिंधू (किंवा इंडस) आणि ब्रह्मपुत्र या प्रकारातले ठळक उदाहरणं आहेत. ह्या खऱ्या एकट्या वाहणाऱ्या नद्या नाहीत, खासकरून पहाडी भागात, जिथे डोंगराळ भागातले असंख्य नाले, उप-नद्या येऊन मिळून या वाहणाऱ्या नद्या मोठ्या होतात. या नद्या तुलनेनी लांब असतात.

ह्या नद्या बऱ्याच उंचीवरून खाली येताना प्रवाहाच्या जोरामुळे डोंगराळ भागाशी घर्षण होऊन मोठ्याप्रमाणावर सुपीक माती वाहून आणतात. त्यामुळे यांच्या किनाऱ्यावर शेती सहज शक्य असल्यामुळे जास्ती लोकसंख्या फोफावली.
बऱ्याचदा *पठारी नद्यांचा* मुख्य स्त्रोत जरी डोंगरावरून सुरु होणारा एखादा झरा असतो तरी त्यांच्या पाण्याची मुख्य उपलब्धता पाऊसावर अवलंबून असते. पडलेला पाउस आजू-बाजूच्या जंगलांमधून साठवून ते भूजलामार्फत पठारी नद्यांना मिळते. म्हणूनच पाऊस किती पडला आणि नद्यांच्या आजू-बाजूला जंगलं किती उरलीत यावर यांचा प्रवाह अवलंबून असतो. ह्या नद्या हिवाळ्यानंतर कोरड्या व्हायला सुरुवात होते. ह्या तुलनेनी कमी लांबीच्या असतात. नर्मदा, तापी, कावेरी, गोदावरी, कृष्णा, महानदी व झुआरी ही काही उदाहरणे. हिवाळ्यानंतर मोठ्या प्रमाणावर रेती उघडी पडते (आणि तीचाच अवैध उपसा आजकाल ह्या नद्यांच्या विनाशाचं कारण बनते आहे). उन्हाळ्यात या नद्यांच्या वाळवंटात टरबूज, खरबूज, काकडी इत्यादी पिके घेतल्या जातात.      

संदर्भ – भूगोलाची विविध पुस्तके

संकलन – निवेदिता खांडेकर

समूह:-ज्ञानभाषा मराठी मुख्य समूह प्रशासक,ज्ञानभाषा मराठी विदर्भ विभाग

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा

No comments:

Post a Comment